अहमदनगर : शेवगाव शहरातील अतिक्रमण कारवाईमध्ये प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. किसन चव्हाण यांनी बुधवारी (दि. १९) सायंकाळी पत्रकार घेतली. आणि यावेळी पत्रकार परिषदेत शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे तसेच शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांचा निषेध व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत प्रा. चव्हाण यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीका करताना, गोरगरिबांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असताना ती थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे ठाम भूमिका घेतली नाही. मात्र, धनदांडग्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची वेळ आली असता त्यांच्या बैठका घेऊन मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्यात येते आणि कारवाई शक्य तितकी लांबणीवर कशी टाकता येईल, यासाठी त्या अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन आले, अतिक्रमणे न काढावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला.
अतिक्रमण कारवाईमध्ये सर्वांसाठी समान निकष असावेत, अशी मागणी करत प्रा. चव्हाण म्हणाले की, या प्रकरणी येत्या काही दिवसांत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडण्यात येईल आणि प्रशासनाला जाब विचारण्यात येईल. त्यानंतरही योग्य कारवाई न झाल्यास अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर अतिक्रमणधारकांचे बिऱ्हाड घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, या सर्व प्रयत्नांनंतरही संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली नाही, तर छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल, असेही प्रा. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.






