भिंगार यशवंत नगर डेअरी फार्ममधील बोगस जमीन विक्रीविरोधात बाळासाहेब आंबेडकरांचा थेट मैदानात उतरण्याचा इशारा
अहिल्यानगर : भिंगार येथील यशवंत नगर डेअरी फार्म, केकती (स.नं. १४, १६ व २१८) मधील जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री व्यवहाराने आता राज्यस्तरीय स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि गरिबांच्या घरांना संरक्षण मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली ‘भिंगार यशवंत नगर डेअरी फार्म बचाव संघर्ष समिती’च्या शिष्टमंडळाने मुंबई येथील ‘राजगृह’ निवासस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या भेटीवेळी समितीचे प्रवीण घाटविसावे, राजू भोसले, राहुल गायकवाड, अनिल शिंदे, तुषार धावडे, संकेत शिंदे, प्रतीक ठोकळ, अशोक सकट, जितीन ओहळ, करण थोरात, सचिन पगारे, तन्वीर सय्यद व अनेक रहिवासी उपस्थित होते. रहिवाशांनी ५०-६० वर्षांपासूनच्या वास्तव्याचे आणि शासनमान्य ‘घरकुल’ योजनेचे सर्व ठोस पुरावे सादर करत हा जमीन विक्रीचा व्यवहार कसा संशयास्पद आहे, हे बाळासाहेबांच्या निदर्शनास आणून दिले.
रहिवाशांची बाजू ऐकून घेतल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “हा गरिबांच्या अस्तित्वाचा लढा आहे. प्रशासनाची दिशाभूल करून झालेली ही खरेदी कायदेशीर प्रक्रियेत टिकणारी नाही. वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीनिशी या रहिवाशांच्या पाठीशी आहे. तुम्ही जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्ष न्यायालयीन आणि आंदोलनात्मक अशा दोन्ही स्तरावर एकजुटीने लढावा, विजय तुमचाच होईल,” असे म्हणाले.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनीही समितीला धीर दिला. “भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर कुटुंब तुमच्या पाठीशी आहे, निष्ठेने लढा,” असे ते म्हणाले. यानंतर शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांचीही भेट घेतली. न्यायालयीन लढा असो वा रस्त्यावरची लढाई, आम्ही सर्वपरीने रहिवाशांसोबत आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.





