पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास, मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंडल विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ओबीसी आरक्षणासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लढ्याची भूमिका, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी कशा लागू केल्या, तसेच ओबीसी आरक्षण चळवळीचा आजवरचा प्रवास याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
ओबीसी समाजाला सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. आरक्षणाच्या माध्यमातून वंचित आणि मागास घटकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याच्या लढ्याला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महिला अध्यक्ष अनिताताई चव्हाण, युवा आघाडी शहराध्यक्ष सागर आल्हाट यांच्यासह ओबीसी समाजातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






