कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने ‘मंडल विजय दिवस’ यंदा अनोख्या आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पारंपरिक कार्यक्रमांऐवजी थेट समाज बांधवांच्या दारात जाऊन संवाद साधत मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत जनजागृती केली.
यावेळी धनगर, सुतार, न्हावी, लोहार, लिंगायत, कुंभार तसेच विविध बहुजन व ओबीसी समाज घटकांतील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती देत समाजातील विविध घटकांमध्ये एकजूट आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मंडल आयोगाचा निर्णय हा मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. या उपक्रमात वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुकाध्यक्ष रविकुमार पंडित, महासचिव प्रियानंद घोडगे, उपाध्यक्ष यशवंत नरवाडे, उपाध्यक्ष सुभाष खाडे, सचिव मुकिंदा ढेपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





