ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना १० ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
अॅड. आंबेडकर यांनी एक्सवर म्हटले आहे की, १० ऑगस्ट २०२५ रोजी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहिले होते. आज १४ ऑगस्ट आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, यापूर्वी १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांविरुद्ध सहकार्यासाठी खरगे यांना पत्र लिहिले होते, परंतु काँग्रेसने या लढाईत उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही. जर राहुल गांधी आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाले असते, तर निवडणूक आयोगाचे “गुपित” आधीच उघड झाले असते आणि भविष्यात हेराफेरीची शक्यता कमी झाली असती.
सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकरणात राहुल गांधी अजूनही हस्तक्षेप करू शकतात, असेही आंबेडकर यांनी सुचवले आहे.
अॅड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “आमच्यात कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे.”
अॅड. आंबेडकर यांनी पाठवलेल्या पत्राला कॉंग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.