मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय कडक शब्दात हल्लाबोल केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील राष्ट्रीय संस्थांमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या सरकारच्या धोरणावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, “स्वतः अमेरिकेच्या तालावर नाचत आहात आणि गुजराती उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेले आहात. पण, किमान ISRO आणि DRDO या राष्ट्रीय संस्थांना तरी सोडून द्या!”
ॲड. आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, “निवडणुका जिंकण्यासाठी कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी आणि देणग्या घेतल्या, आणि आता देश विकून त्याचे व्याज भरणार आहात का?”
DRDO ची क्षेपणास्त्र निर्मिती तंत्रज्ञान (Technology Transfer) खाजगी संरक्षण कंपन्यांना देण्याचा निर्णय आणि ISRO द्वारे रॉकेट निर्मितीचे काम टप्प्याटप्प्याने खाजगी क्षेत्राकडे सोपवून संशोधन आणि नव्या स्पेस तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचे वृत्त समोर आले आहे. या निर्णयावरूनच प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर देश विकल्याचा गंभीर टीका केली आहे.
संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानातील खाजगी सहभागामुळे देशाच्या सुरक्षेवर आणि स्वावलंबनावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत वंचित बहुजन आघाडीने या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे.






