ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राहुरीत जंगी सभा!
Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत केंद्र सरकार, भाजप आणि विद्यमान राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. “आज विरोधी पक्षाचा खरा आवाज फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच सुरू आहे. इतर सर्व राजकीय पक्ष ईडीच्या दबावामुळे गप्प बसले आहेत, त्यामुळे ते भाजपविरोधात लढू शकत नाहीत,” असा घणाघात त्यांनी केला.
ॲड. आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरही प्रश्न उपस्थित केले. या करारामुळे अमेरिकेतील शेतीमाल भारतात कमी दरात येईल, असे सांगत त्यांनी उदाहरण दिले की, ब्राझीलमधील साखर 30 रुपये किलो तर भारतात 40 रुपये किलो आहे. त्यामुळे व्यापारी स्वस्त साखरेकडे वळतील आणि स्थानिक शेतकरी संकटात सापडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. (Prakash Ambedka Rahuri Election Campaign)

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उल्लेख करत त्यांनी इशारा दिला की, आता ऊस उत्पादक शेतकरीही अशाच परिस्थितीच्या उंबरठ्यावर येऊ शकतात. “ही परिस्थिती टाळायची असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा,” असे आवाहन त्यांनी केले.
भाजपवर निशाणा साधताना त्यांनी भोंदू अशोक खरातचा उल्लेख करत, “अशोक खरातसारख्या भोंदूला भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांनी पुढे केले आणि आता त्यालाच वाचवत आहेत. भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे,” असा घणाघात केला.
सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना आंबेडकर म्हणाले की, “हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाराचे सरकार आहे. 1 लाख 5 हजार कोटी रुपयांचे सोने गायब झाले आहे. ही माहिती स्वतः रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने दिली आहे. तसेच कॅगच्या अहवालानुसार अनेक बँकांमधून मोठ्या प्रमाणात पैसे गायब झाले आहेत. हा सर्व पैसा आणि सोने नेमके गेले कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Prakash Ambedka Rahuri Election Campaign)
विरोधी पक्ष टिकून राहणे हे सामान्य माणसाच्या हितासाठी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच काँग्रेस आणि पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनाही वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरही सरकारवर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाबाबत खोटे विधान केले, मात्र त्याविरोधात एकाही आमदाराने आवाज उठवला नाही. सभागृहातील रेकॉर्ड भविष्यात अधिकृत नोंद म्हणून कायम राहणार असताना सत्य मांडण्याचे धाडस कोणीच दाखवले नाही,” असे ते म्हणाले. राज्य सरकार ही केस दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, “आम्ही ही केस दाबू देणार नाही. 27 आरोपी पोलिसांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. (Prakash Ambedka Rahuri Election Campaign)
या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिशा शेख, प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, तय्यब जफर, जितरत्न पटाईत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





