ॲड. प्रकाश आंबेडकर : ‘भूमिका’ नाटकातील संवादातून संविधानिक मूल्यांची पेरणी
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच ‘भूमिका’ या नाटकाचा प्रयोग पाहिला असून, या नाटकावर त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. या नाटकात मांडलेले संविधानिक विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवी दृष्टिकोनाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.
ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, “नुकतंच ‘भूमिका’ नावाच्या नाटकाचा प्रयोग पाहिला. क्षितिज पटवर्धन लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, श्रीपाद पद्माकर निर्मित आणि सचिन खेडेकर यांनी अभिनय केलेलं हे नाटक. संविधान, संविधानिक मूल्य, विविध विचार प्रवाहांचा पगडा असणाऱ्या व्यक्तीं सोबतचा (अगदी झेन जी पिढी सोबतचा) सजग परंतु, त्यांना न दुखवता विचार करायला लावणारा संवाद. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाती, धर्माच्या, प्रतिमा पूजनाच्या पलीकडे घेऊन जाऊन त्यांच्या माणूसपणाच्या व्यापक विचारांची मांडणी हे नाटक करते. आताच्या सर्वच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय गुंतागुंतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेले वैचारिक भंजाळलेपण थोडे तरी दूर करण्याचा प्रयत्न हे नाटक करते.
क्षितिज पटवर्धन सारख्या एका तिशी ओलांडलेल्या तरुणाने हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय चार वर्षांचा अभ्यास करून अडीच तासांमध्ये मांडण्याचा कष्टपूर्वक प्रयत्न केला आहे. आपल्याला मानवीय संविधानिक मूल्यांच्या आधारावर बदल हवाय तर ‘भूमिका’ घेणे महत्त्वाची आहे. भूमिका घेतल्याने काय सोडावे लागते? कशाचा आग्रह धरावा लागतो? त्यामुळे काय सोसावे लागते? त्यासाठी प्रत्येकाचा कसा कस लागतो? परिस्थिती समोर शरणागती कशी घेतो? या सर्वातून जेव्हा माणूस तगतो तेव्हा काय होते? याची मांडणी कमालीच्या ताकदीने क्षितिजने केली आहे. तर चंद्रकांत कुलकर्णी सारख्या मराठी रंगभूमीवर गेली २५ वर्षे त्या-त्या काळातील सामाजिक नाटके देणाऱ्या दिग्दर्शकाने हे नाटक आताचा काळ लक्षात घेऊन उभे केले आहे.
सचिन खेडेकर सारख्या सामाजिक भान असलेल्या उत्तम नटाने ही भूमिका वैचारिक, भावनिक तसेच राजकीय अर्थ नव्हे भावार्थ लक्षात ठेवून उठवली आहे. यात त्यांच्या अभिनयाचा ठसा नव्हे तर एका भारतीय नागरिकत्वाचा ठसा त्यांनी उठवलेला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या अभिनयात कुठलाही अभिनिवेश नव्हता, तर ते तुम्ही-आम्ही आहोत असेच वाटते. हे आम्हाला काय सांगणार? असे ज्यांना वाटते, त्यांनी हे नाटक आधी आवर्जून पाहायला हवे आणि नंतरच त्यावर भाष्य करायला हवे. अर्थात दोन तासांत बाबासाहेबांच्या विचारांचा आणि त्याच्या प्रभावाचा इतका मोठा पट उलगडणे शक्य नाहीय.
पण तरीही एका सोप्या कथानकामध्ये याची गुंफण केल्याने त्यावरून मोठा पट उलगडतो तो प्रत्येकाच्या डोक्यात आणि मनात !!! खूप न हसवणारे मात्र मनातल्या मनात एक प्रकारच्या गुदगुल्या करणाऱ्या या नाटकाचा १२६ वा प्रयोग होता. या प्रयोगाला येण्याचा आग्रह नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी केला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार ! सर्वांनी आवर्जून हे नाटक बघावे !”



