मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडियावरील ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला ‘नर्क’ संबोधून देशाचा अपमान केल्याचा दावा करत, ॲड. आंबेडकर यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ‘एपस्टीन फाइल’मध्ये आल्यापासून ते अमेरिकेसमोर कोणतीही भूमिका न घेता शरणागती पत्करत आहेत, ज्याचा फटका देशाला बसत आहे. या मौनामुळेच भारत आणि पंतप्रधान मोदी यांची जगभरात थट्टा उडवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Prakash Ambedkar)
आपल्या ट्विटमध्ये ॲड. आंबेडकर यांनी अशा अनेक घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यात अमेरिकेने भारताचा अपमान केला आणि पंतप्रधान मोदींनी त्यावर मौन बाळगले. त्यांनी नमूद केले की, अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या ठोकून भारतात पाठवले, भारतावर भारी आयात शुल्क (टॅरिफ) लादले आणि भारत-पाकिस्तान युद्धाच्या विषयावर ट्रंप यांनी एकतर्फी भूमिका घेतली, तरीही मोदी गप्प राहिले. तसेच, रशियाकडून तेल खरेदी न करण्याच्या अमेरिकेच्या आदेशाचे भारताने पालन करणे आणि इराणसारख्या आपल्या पारंपरिक मित्राशी संबंध बिघडणे यांसारख्या बाबींवरही पंतप्रधानांनी शांत राहणे पसंत केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, अमेरिकेला पंतप्रधान मोदींच्या अशा कोणत्या ‘काळ्या कारनाम्यांची’ माहिती आहे, ज्यामुळे ते सातत्याने होणारी ही बेइज्जती गप्प बसून सहन करत आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांच्या मौनाचा खरपूस समाचार घेतला.






