कळमनुरी : थोर समाजसुधारक, साहित्यिक आणि फकिरांचे जनक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, कळमनुरी तालुक्यातील आडा ग्रामपंचायतीला मात्र या महापुरुषाच्या जयंतीचा चक्क विसर पडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीला कुलूप असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका सचिव मुकिंदा ढेपे यांनी पुढाकार घेत हे कुलूप उघडून ग्रामपंचायत कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली.
प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड –
१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरी केली जाते. सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि ग्रामपंचायतींमध्ये महापुरुषांना अभिवादन करण्याचा शासकीय नियम आहे. मात्र, आडा ग्रामपंचायतीचे प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत कार्यालयाला कुलूप लावून ठेवले होते. महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशीच ग्रामपंचायतीचा हा भोंगळ कारभार आणि अनास्था पाहून परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका सचिव मुकिंदा ढेपे यांनी तात्काळ आडा ग्रामपंचायत गाठली. बंद असलेली ग्रामपंचायत पाहून त्यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा तीव्र निषेध नोंदवला.
यानंतर त्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून कार्यालयात प्रवेश केला. तेथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून त्यांनी जयंती साजरी केली. यावेळी सोनाजी काळे, ग्रामपंचायत सदस्य दादाराव शिंदे व अरविंद शिंदे, धम्मपाल ढेपे आदी उपस्थित होते.





