मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सल्ला दिलाय. हल्द्वानी येथे आरएसएस आणि भाजपकडून करण्यात आलेले “शुद्धिकरण” हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्याविरोधातील जातिवाद आणि अस्पृश्यतेचे एक निंदनीय कृत्य असून, याद्वारे भाजप-आरएसएसची मनुवादी विचार पुन्हा एकदा उघडा झालाय, याहूनही वाईट बाब म्हणजे स्वतःच्याच पक्षातील सदस्यांनी या जातिवादी कृत्याची स्पष्टपणे विरोध न केल्यामुळे खर्गे यांना आपले दुःख व्यक्त करावे लागले, असा मुद्दा त्यांनी मांडला.
राहुल गांधी यांनी घटनेच्या १५ दिवसांनंतर या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन प्रेझेंटेशन दिले आणि शुद्धिकरण करणाऱ्यांना एक्सपोज केले, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, प्रेझेंटेशनमध्ये केवळ फोटो दाखवून काहीही साध्य होणार नाही. मल्लिकार्जुन खर्गे विरोधात हा जातीयवाद भाजप-आरएसएसनेच केला आहे, यावर सर्वांचे एकमत आहे.
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना पुढील पंतप्रधान बनवण्याची तयारी करत आहेत ही चांगली गोष्ट असली, तरी जे पक्षातील मोठे लोक आपल्याच पक्ष अध्यक्षांवर झालेल्या जातीयवादावर गप्प बसतात, ते भाजपच्या मनुवाद्यांपेक्षा कसे काय वेगळे किंवा चांगले असू शकतात, असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांना न्याय मिळवून देण्याची भाषा करत आहेत, परंतु ते त्यासाठी नक्की काय करत आहेत? आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अद्याप याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवली आहे का?
असा सवाल त्यांनी केला. जेव्हा राहुल गांधी स्वतःच्या पक्षाध्यक्षासाठी लढणार नाहीत, तेव्हा देशातील गरीब, दलित आणि शोषित समाज काय समजणार, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. शेवटी “Walk the talk” या इंग्रजी म्हणीचा दाखला देत, केवळ तोंडाने बोलण्यापेक्षा राहुल गांधी यांनी आपल्या शब्दांना ॲक्शन आणि कृतीची साथ देऊन दाखवावे, असा स्पष्ट सल्ला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिला आहे.





