मुंबई : प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने २२ एप्रिल रोजी रात्री दोन वाजता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ट्विटवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष दुजोरा दिल्याची चर्चा रंगली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही यावर उडवाउडवीचे उत्तर दिल्याने या भेटीबाबत संशय अधिक गडद झाला.
दरम्यान, या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रबुद्ध भारतवर कारवाईचा इशारा दिला असून संबंधित वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना प्रबुद्ध भारतच्या वृत्त संपादक जीतरत्न पटाईत यांनी आक्रमक भूमिका घेत, “मुख्यमंत्री म्हणत आहेत बातमी खोटी आहे, नोटीस पाठवणार आहेत, तर येऊद्या नोटीस… मग बघू,” अशी ठाम प्रतिक्रिया दिली.
पटाईत यांनी पुढे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, “मुख्यमंत्र्यांनी याआधी किती लपूनछपून भेटी घेतल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अमृता फडणवीस यांनीदेखील विविध प्रसंगी त्याबाबत खुलासे केले आहेत,” असा दावा केला.
या प्रकरणामुळे पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रबुद्ध भारतने मांडलेल्या वृत्तावरून राजकीय वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. आता या कथित नोटीसप्रकरणी पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






