Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात सामाजिक भेदभावाचे गंभीर चित्र समोर आले आहे. लग्नाच्या पारंपरिक वरातीत घोड्यावर बसलेल्या २३ वर्षीय दलित नवरदेवावर काही व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२१) संध्याकाळी घडली.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोलू अहिरवार हा ‘रचवाई’ विधीसाठी घोड्यावरून गावातून फेरी काढत होता. यावेळी एका अरुंद गल्लीत त्याची वरात अडवण्यात आली. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, रस्ता रोखण्यासाठी मुद्दाम वाहन उभे करण्यात आले होते. रस्ता मोकळा करण्यावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
वाद वाढताच काही जणांनी नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून काठ्या-दांडक्यांनी मारहाण केली. वरातीतील इतर लोकांनाही लक्ष्य करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, दिव्यांग असलेल्या नवरदेवावरही निर्दयीपणे हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यात गोंधळ आणि हल्ल्याचे दृश्य कैद झाले आहे.
नवरदेवाची आई विद्या अहिरवार यांनी वरात काढण्यास विरोध करण्यात आल्याचा आरोप करत, कुटुंबीयांनाही मारहाण झाल्याचे सांगितले. त्यांच्या मते, मुलीवर हल्ला झाला असून काही दागिनेही गायब झाले आहेत. नवरदेवाची बहीण मनीषा हिनेही हल्लेखोरांनी जातीवाचक अपमान करत विधी करण्यास विरोध केल्याचा आरोप केला.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवून अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे दलित समाजात संताप व्यक्त होत असून, सामाजिक समतेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.






