NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे परिणाम आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही उमटताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेभोवती निर्माण झालेला तणाव, पेपरफुटी प्रकरणानंतरचे अनिश्चित वातावरण आणि परीक्षा प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. (NEET Paper Leak)
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी अभ्यासात अत्यंत गुणवंत होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने मेहनत घेत होती. तिने NEET सोबतच CET सारख्या इतर स्पर्धा परीक्षाही दिल्या होत्या. कुटुंबातील मोठी बहीण इंजिनिअर असल्याने स्वतःही वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा निर्धार होता. मात्र NEET पेपरफुटी प्रकरण उघड झाल्यानंतर परीक्षा प्रक्रियेबद्दल निर्माण झालेला संभ्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढलेली असुरक्षितता तिच्यावर परिणाम करत गेल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात लातूरमधील RCC कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. सीबीआय चौकशी, धाडी आणि अटकसत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांना मेहनत करूनही न्याय मिळेल का? असा प्रश्न पडू लागल्याची भावना पालक आणि शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. (NEET Paper Leak)
कुटुंबीयांच्या जबाबानुसार, विद्यार्थिनीने शेतातील लिंबाच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. या घटनेत कोणावरही संशय नसल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. मात्र या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांचा वाढता मानसिक ताण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
शिक्षणतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, स्पर्धा परीक्षा ही केवळ गुणांची स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक क्षमतेचीही कठीण परीक्षा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी समुपदेशन, भावनिक आधार आणि मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन मिळणे तितकेच आवश्यक आहे. लातूरसारख्या शिक्षणाच्या केंद्रात दरवर्षी हजारो विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याची स्वप्ने घेऊन येतात. मात्र वाढती स्पर्धा, भविष्यासंबंधीची चिंता आणि पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अशा घटनेमुळे विद्यार्थांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र , पेपर फुटीची घटना काही कमी होताना दिसून येत नाही.





