मुंबई : शिवडी तालुक्यातील प्रभाग क्रमांक २०६ अंतर्गत इंदिरा नगर आणि रामगड परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून अंधाराच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या समस्येच्या निराकरणासाठी वंचित बहुजन आघाडी (शिवडी तालुका) यांच्या वतीने सातत्याने पत्रव्यवहार, पाठपुरावा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आले होते.
अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने (Mumbai Port Authority) मे २०२६ मध्ये इंदिरा नगर परिसरात सुमारे ९० आधुनिक एलईडी दिव्यांचे खांब उभारून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील सुरक्षितता वाढण्यास आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोकहिताच्या कामासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष, अधिकारी वर्ग तसेच मुख्य यांत्रिकी अभियंता काडेकुझी रमेश यांचे आभार मानले आहेत.
Also Read : सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी मुंबई सहसचिव सुदेश गमरे, शिवडी तालुका समन्वयक विजय जैस्वार, माजी तालुका उपाध्यक्ष मोहम्मद सलीम खान, कार्यकर्त्या आशा कदम, विक्रम एस. कांबळे, विक्रम झाल्टे, सागर खैरे आणि विशाल इंगळे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच अर्जाची तयारी आणि पाठपुराव्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.
दरम्यान, मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या हद्दीतील इतर अंधारग्रस्त वसाहतींमध्येही अशाच प्रकारे मोठ्या एलईडी दिव्यांचे खांब उभारण्यात यावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासंदर्भात मुंबई पोर्ट प्राधिकरणाने उर्वरित भागांमध्येही टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.






