नवी दिल्ली: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) सप्टेंबर २०२६ मध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची घोषणा केली आहे. ही संपूर्ण मालिका नवी दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत अफगाणिस्तान यजमानाची भूमिका बजावणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या तारखांना आणि ठिकाणाला मान्यता दिली असून, एसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नसीब खान यांनी अधिकृत पत्राद्वारे या दौऱ्याला पुष्टी दिली आहे. लवकरच दोन्ही बोर्डांकडून याची औपचारिक घोषणा केली जाईल.
अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्यांदाच भारतीय भूमीवर भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने लखनऊ, देहरादून आणि ग्रेटर नोएडा येथे इतर देशांविरुद्ध ‘होम ग्राऊंड’ म्हणून सामने खेळवले आहेत, मात्र भारतालाच प्रतिस्पर्धी मानून भारतात यजमानपद भूषवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
Also Read : युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!
दुसरीकडे, या मालिकेमुळे भारतीय संघाचा प्रस्तावित बांगलादेश दौरा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) १ ते १३ सप्टेंबरदरम्यान भारताविरुद्ध ६ पांढऱ्या चेंडूंच्या सामन्यांची योजना आखली होती, मात्र नव्या वेळापत्रकामुळे दोन्ही मालिकांच्या तारखा जुळत असल्याने भारताचा बांगलादेश दौरा अडचणीत आला आहे.
टी-२० मालिकेचे वेळापत्रक: पहला टी-२० सामना रविवार, १३ सप्टेंबर रोजी रंगेल, दुसरा सामना मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तर तिसरा आणि अंतिम सामना गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.





