कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील शेणोडी–मोरघव्हाण रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून या मार्गावरील शालेय बस सेवा पूर्णपणे बंद आहे. याचा फटका परिसरातील चार-पाच गावांतील शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, पावसाळ्यात त्यांना शिक्षणासाठी पायी किंवा महागड्या ऑटोने प्रवास करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत, “येत्या २ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करून बससेवा सुरू करा; चालक नसेल तर आमदारांना बोलावून बस चालवायला सांगा, अन्यथा PMGSY कार्यालयात ठिय्या आंदोलन करू!” असा आक्रमक इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजने (PMGSY) अंतर्गत शेणोडी–मोरघव्हाण रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे हे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. रस्ता खराब असल्याने मागील दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाने बससेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पावसाळ्यात चिखल तुडवत पायी जावे लागत आहे किंवा आर्थिक भुर्दंड सहन करत ऑटोने प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत असून त्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे.
आज समस्त शालेय विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजू कांबळे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. राजू कांबळे यांनी त्वरित विद्यार्थ्यांसह एसटी महामंडळाच्या डेपो मॅनेजर यांच्या दालनात धडक दिली आणि बससेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली. “जर एसटीच्या चालकाला या रस्त्यावरून बस चालवायला जमत नसेल, तर कळमनुरीच्या आमदारांना बोलावून घ्या आणि त्यांना बस चालवायला सांगा,” असा टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या संबंधित अभियंत्यांशी चर्चा करून रस्त्याचे प्रलंबित काम दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
“गेली दोन महिने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड आम्ही सहन करणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग अडवणारा कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही. येत्या दोन दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करून बससेवा सुरू झाली नाही, तर सर्व शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय, हिंगोली येथे तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राजू कांबळे यांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजू कांबळे, युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद अस्लम, युवा तालुका महासचिव दिनेश पाईकराव, सुशील वाढवे, समाधान पाईकराव यांच्यासह परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





