मुंबई (चैत्यभूमी) : माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ४४ महिलांसाठी केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दि. २१ मे २०२६ ते २७ मे २०२६ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी, दादर (पश्चिम), मुंबई येथे पार पडले. शिबिराचे उद्घाटन आणि समारोप राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
समारोप प्रसंगी माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले की, पूर्वी माता रमाई आंबेडकर यांच्याविषयी मर्यादित साहित्य उपलब्ध होते. मात्र आता मोठ्या प्रमाणावर मराठी तसेच इंग्रजी भाषेत पुस्तके उपलब्ध झाली असून देशभरात विविध ठिकाणी त्यांची स्मारकेही उभारण्यात आली आहेत. “माता रमाई यांना वाचल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एससी-एसटी असोसिएशन, मुंबई शाखेच्या वतीने चैत्यभूमीसाठी दोन व्हीलचेअर्स भेट देण्यात आल्या. त्या डॉ. भीमराव आंबेडकर आणि दर्शना भीमराव आंबेडकर यांनी स्वीकारल्या.
कार्यक्रमात ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, माता रमाई यांनी घरातील कोणत्याही अडचणी बाबासाहेबांना जाणवू दिल्या नाहीत. उलट त्यांच्या शिक्षणासाठी आणि ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. “माता रमाई यांच्या त्यागामुळेच बाबासाहेब जगाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले,” असे त्यांनी नमूद केले. तसेच माता रमाई यांनी स्वतःच्या अडचणींपेक्षा समाजहिताला अधिक महत्त्व दिले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी. बी. तेलतुंबडे, केंद्रीय महिला विभाग सदस्य व महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनंदा वाघमारे तसेच मुंबई उपाध्यक्ष सुषमा कसबे यांनीही माता रमाई यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. डॉ. एस. एस. वानखडे होते. त्यांनी शिबिरार्थी महिलांच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये धाराशिव दक्षिण जिल्हा शाखेच्या अध्यक्ष राजश्री कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ठाणे जिल्हा शाखेच्या महानंदा अरविंद चोपडे यांनी द्वितीय, तर जळगाव पूर्व जिल्हा शाखेच्या विद्या सुभाष झनके यांनी तृतीय क्रमांक मिळवला. केंद्रीय शिक्षक म्हणून उत्तीर्ण झालेल्या सर्व नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षिकांना ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या हस्ते केंद्रीय शिक्षक प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव सुनंदा पवार यांनी केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमा पवार, मुंबई प्रदेश शाखा अध्यक्ष विलास वानखडे, सरचिटणीस दयानंद बडेकर, मीडिया सदस्य सिद्धार्थ अहिरे, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष स्वातीताई गायकवाड, मुंबई प्रदेश महिला सरचिटणीस छाया बनसोडे, निर्मला गवळी, विनिता माने, सुनिता मस्के तसेच मुंबई प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील महिला-पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या उपप्रमुख सुप्रिया कासारे, सचिव अनिल मनोहर, सचिव सागर गांगुर्डे, सदस्य व शिबिर व्यवस्थापक सुनील बनसोडे, चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे, चैत्यभूमी पुस्तकालय संचालक मिलिंद कदम, बीएसआय मीडियाचे सिद्धार्थ अहिरे तसेच मुंबई प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य शाखेतील महिला-पुरुष पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






