– संजीव चांदोरकर
तैवानच्या शेयर मार्केटचे बाजारमूल्य / मार्केट कॅपिटलायझेशन (४.९५ ट्रिलियन डॉलर्स) भारताच्या बाजारमूल्यापेक्षा (४.९२ ट्रिलियन डॉलर्स) जास्त झाले! मागच्या आठवड्यात अनेक सर्वच मिडिया मध्ये मथळ्यात झळकली, सोशल मीडियावर देखील!
काय खरच एवढी चिंता करण्यासारखी घटना आहे का ही?
देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे किंवा नाही हे मापायचा बॅरोमीटर काय ? जीडीपी वाढत आहे का ? जगात कितवा क्रमांक ? शेयर मार्केट जोशात आहे की नाही ? त्याचे बाजार मूल्य वाढत आहे की नाही ? ….
……हेच आर्थिक तत्वज्ञान मानणाऱ्या मेन्स्ट्रीम मिडियाने तैवानचे बाजारमूल्य भारताच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त झाले म्हणजे जणू काही भारतीय अर्थव्यवस्थाच कोसळली ….असा सूर लावला तर समजण्यासारखे आहे. पण याकडे कसे बघायचे ?
तैवानची लोकसंख्या २.३ कोटी आणि भारताची १४० कोटी. तैवानची जीडीपी जेमतेम १ ट्रिलियन डॉलर्स तर भारताची जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त. तैवानच्या शेयर बाजाराचे बाजारमूल्य फक्त तीन वर्षापूर्वी भारताच्या बाजारमूल्यापेक्षा एक तृतीयांश होते, ते तीन वर्षात भारताएवढे झाले. हे आकडे खरेच आहेत. पण नक्की काय झाले?
वस्तुस्थिती ही आहे की तैवानच्या शेयर मार्केटच्या इंडेक्स मध्ये फक्त एका कंपनीचा वाटा Taiwan Semiconductor Manufacturing Corporation (TSMC) तब्बल ४२ टक्के आहे.
फक्त दोन वर्षापूर्वी तो शेयर १४० डॉलर्स होता तो ४२० डॉलर्स झाला आहे. तैवान बाजारमूल्याची ही वन लाइन स्टोरी आहे.
तीच स्टोरी अमेरिकेच्या शेयर बाजाराची आहे.
अमेरिकेतील एस अँड पी ५०० निर्देशांक ऐतिहासिक उंचीवर पोचला आहे. ( इराण युद्ध, अमेरिकेन अर्थव्यवस्थेत वाढलेली महागाई, याचे काहीही सोयरसुतक शेयर बाजाराला नाही. पण तो पोस्टचा विषय नाही) या निर्देशांकाच्या एकूण ७० ट्रिलियन डॉलर्स बाजारमूल्यांच्या ४० टक्के वाटा फक्त दहा टेक कंपन्यांचा आहे ( इन्व्हिडिया, गुगल, मेटा, ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट इत्यादी)
भारताकडे अशा मूलभूत काम करणाऱ्या टेक कंपन्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणे मी अनेकवेळा लिहिली आहेत. उदा. भारतातील मोठ्या कंपन्या आर अँड डी वर खर्च करत नाहीत. नुसता नफा एके नफा करत राहतात. किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेतील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा वर्षानुवर्षे वाढत नाहीये (१५ टक्के प्लस मायनस) इत्यादी. त्यावर फारशी खंत नाही.
पण भारताच्या शेयर बाजाराचे बाजारमूल्य कोणत्या देशापेक्षा कमी झाले की जास्त ? किंवा भारताच्या जीडीपीचा क्रमांक जगात तिसऱ्या स्थानावरून चौथ्यावर गेला की पाचव्या क्रमांकावर यावर नको तेवढ्या चर्चा होतात
कोट्यवधी जनतेच्या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्था ठीक काम करत आहे किंवा नाही त्याचे मापदंड भिन्न आहेत ;
रोजगार निर्मिती, रोजगाराची गुणवत्ता , वेतनमान , शिक्षणावर आणि आरोग्य क्षेत्रावर होणारा कमी शासकीय खर्च, वाढती महागाई, इंधनाचे दर, शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष, सारा भर पैशाचे वाटप करण्यावर , केंद्र सरकारचा नाकर्तेपणा .
यावर सतत सार्वजनिक चर्चा होतील हे बघावयास हवे हे अधिक चिंतेचे विषय आहेत.
हेच बघा ना. तैवानची दरडोई जीडीपी ४०,००० डॉलर्स आणि भारताची २,८०० डॉलर्स किंवा तैवान आणि इतर देश शिक्षण, आरोग्य यावर दरडोई किती जास्त खर्च करतात याची खंत नाही. खंत कशाची तर बाजारमूल्य जास्त झाले याची.
सारी राजकीय लढाई सार्वजनिक चर्चाविश्व / पब्लिक डिस्कोर्स, नॅरेटिव्ह कोण सेट करते , लोकांच्या मनावर काय अधिक निर्णायकपणे नोंदवले जाते याची असते





