– संजीव चांदोरकर
यामागील खतरनाक गेम कळायला कोणी सेफोलोजीस्ट असण्याची गरज नाही.
लोकसंख्येत ८० टक्के गरीब ; गरीब हि संज्ञाच वर्गीय संज्ञा आहे. ज्यांचे भौतिक प्रश्न जीवघेणे असतात ते गरीब
काय असतात त्यांचें प्रश्न हे कळायला कोणी अर्थतज्ज्ञ असण्याची गरज नाही
त्यांचे प्रश्न तेच ते. वैश्विक आणि सर्वकालिक ! देशानुसार, प्रांतानुसार, काळानुसार बदलतील तेवढेच
पण गाभ्यात तेच अपुऱ्या उत्पन्नाचे, रोजगाराचे, स्वयंरोजगाराचे, आतबट्याच्या शेतीचे, राहणीमानाचे, महागाईचे , मुलांच्या शिक्षणाचे, आजारपणाचे, आरोग्यावरच्या खर्चाचे, पडक्या, गळक्या घरांचे आणि अनेक. भारतात नाही प्रत्येक देशात. तेच प्रश्न.
निवडणुकीच्या वेळी शहरी / ग्रामीण भागातील मतदानात गरिबांच्या वस्त्यात मतदानाची टक्केवारी असते ७० ते ८० टक्के आणि त्याच मतदार संघात सुखवस्तू वस्त्यात असते ४० टक्के; मिळून मतदार संघाची सरासरी बनत असते ६० टक्के
निवडणुकीतील मतदान खरेच वर्गीय / आर्थिक प्रश्नांवर होऊ लागले तर ?
या फक्त एका प्रश्नांनी सत्ताधारी राज्यकर्ते आणि त्यांना पोसणारे धनदांडगे निवडणुकीच्या काळात सैरभैर होतात. त्यांची झोप उडते.
गरिबांनी कसेही करून त्यांना भेडसावणाऱ्या, सामायिक असणाऱ्या भौतिक / आर्थिक प्रश्नांवर एकगठ्ठा मतदान करू नये म्हणून सुरु होतो एक गेम
गरिबांच्या “प्रजाती” / कॅटॅगिरीज तयार करण्याचा आणि त्यांच्यात फूट पाडण्याचा खेळ
बहुसंख्यकांतील गरीब / अल्पसंख्यकांतील गरीब
उच्च , मध्यम जातीतील गरीब / निम्न जातीतील गरीब
स्थानिक गरीब / बाहेरून आलेले स्थलांतरित गरीब
एक भाषा बोलणारा गरीब / दुसरी , तिसरी भाषा बोलणारा गरीब
या राज्यातील गरीब / त्या राज्यातील गरीब
या झेंड्यामागचे गरीब / त्या झेंड्यामागचे गरीब
गरिबांना निरनिराळी लेबले लावून, विविध गटात विभागण्यासाठी त्यांच्या भात्यात असंख्य सांस्कृतिक, विकृत केलेल्या इतिहासाची, बनवलेल्या खोट्या नाट्या स्टोऱ्यांची शस्त्रे / हत्यारे होती / आहेत
खरे तर गरीब कुटुंबातील
लहान मुलांचा निरागसपणा , बालमृत्यू, प्रौढांचे अकाली मृत्यू, म्हाताऱ्या माणसांचा हतबलपणा
विविध पर्यावरणीय अरिष्टात शेती / बागायती / घर / संसार / गुरे / ढोरे / पक्षी/ वाहने / इतर मालमत्तांचे होणारे नुकसान आणि मानवी मृत्यू
१२-१२ तास काम करणाऱ्या कष्टकरी लोकांचा घाम, जीवाचे रान करून पै पै साठवणाऱ्या स्त्रिया
छोट्या / सूक्ष्म धन्दा / व्यवसाय / स्वयंरोजगारी करणाऱ्या डोळ्यातील धंदा वाढवण्याच्या आकांक्षा, कर्जाचे हप्ते / ईएमआयच्या रकमेच्या / तारखेच्या दहशतीखाली सतत वावरणे
आपल्या पोटच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा त्यांचा आटापिटा, कुटुंबातील आजारी , गंभीर आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी त्यांची पैशाची जुळवाजुळव आणि धावपळ
तरुण तरुणींची संसार करण्याची, आपले घर वसवण्याची / सजवण्याची / मुलांना जन्माला घालून त्यांना वाढवण्याची स्वप्ने आणि
त्यांच्या घरांमधील रडणे आणि मूक आक्रोश
यात काही म्हणजे काहीही फरक नसतो. कधीही नव्हता. कधीही नसणार आहे.
शेवटचे. आपण एखाद्या अपवादात्मक व्यक्तिगत शोकांतिकेबद्दल उर बडवून घेत नाही आहोत मित्रांनो. देशातील ७० ते ८० टक्के लोकांबद्दल बोलत आहोत.






