पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरात रविवारी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर एका ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे. (Ashadhi Wari 2026)
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज परिसरातील वारकरी या अपघातात बाधित झाले. धडक इतकी जोरदार होती की तीन महिला वारकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून इतर जखमी वारकऱ्यांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Also Read : वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाला ताप असल्याने त्याने औषधे घेतली होती. त्यामुळे वाहन चालविताना त्याला ग्लानी आल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Ashadhi Wari 2026)
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
– नंदा पवार (वय ६०), रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
– माधवी राजाराम सलगरे (वय ५५), रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
– राजश्री शंकर भोसले (वय ५५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली
या घटनेतील पुढील तपास पोलिस करत आहेत.





