औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद मध्य शहराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिसरात या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पदाधिकारी थेट नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील चेतना नगर आणि रमाबाई नगर येथे पदाधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर मांडले.
नागरिकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पाठपुरावा करेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा हा उपक्रम पुढील काळातही विविध प्रभागांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, शहर महासचिव भगवान खिल्लारे, शहर महासचिव आनंद शेजूळ, महासचिव पुरुषोत्तम दाभाडे, संघटक राहुल वेलदोडे, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, सचिव प्रमोद नवगिरे तसेच स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






