मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘बौद्धांनो वाचा आणि विचार करा, बौद्धांसोबत कोण आहे?’ या आशयाचे पोस्टर बुद्ध विहाराजवळ लावण्यात आले असून, या पोस्टरने लक्ष वेधून घेतले आहे.
यावेळी स्थानिक नागरिक बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांनीही ‘महाबोधी महाविहार’ आंदोलनावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी बोधगया येथील महाबोधी विहाराला भेट दिली होती, मात्र तिथे सुरू असलेल्या आंदोलनास्थळी ते आले नाहीत, तसेच त्यांनी याबाबत भाष्य केले नाही, यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बुद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांचा सहभाग असल्याचे नागरिकांनी अधोरेखित केले. नेते बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः आंदोलनात भाग घेतला असून, भीमराव आंबेडकरांनी दोनवेळा आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात आंबेडकर कुटुंबाने आंदोलनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याची ग्वाही दिली आहे.
नागरिकांचा संताप आणि इशारा
राजकीय नेत्यांच्या या उदासीनतेवर बौद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “जर तुम्ही आमच्या ‘महाबोधी बुद्ध विहारासाठी’ बोलू शकत नसाल, तर तुमचा चपलांचा हार घालून स्वागत करु, असे संतप्त उद्गार त्यांनी काढले. जे लोक आपल्या अस्मितेसाठी आणि नेत्यांसाठी आवाज उठवू शकत नाहीत, तसेच महाविहाराबद्दल बोलत नाहीत, अशा लोकांना समाजात स्थान नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस आणि भाजपच्या “दलाल लोकांना” स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे ते समाजात येत असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही.