पुणे : अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव जी महाराज (पुणे) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या दुःखद प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुण्यात आयोजित शोकसभेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
ॲड. आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया (एक्स) खात्यावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुखदेव जी महाराज यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन आणि संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांच्या प्रसारासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या निधनामुळे रविदासिया समाजासह संपूर्ण समाजजीवनाची मोठी हानी झाली आहे.
या वेळी वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवाराच्या वतीने सुखदेव जी महाराज यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनपर कार्याची आठवण उपस्थितांनी यावेळी काढली.




