नवी मुंबई : ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी धम्मदूत बुद्ध विहार, ईश्वरनगर (दिघा) येथे पक्षप्रवेश व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मिलिंद लहाने यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
ईश्वरनगर, दिघा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल अंगरख यांच्यासह परिसरातील शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. इतर पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा केवळ वापर केला जातो; मात्र वंचित बहुजन आघाडीत कार्यकर्त्यांना मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा दिली जाते. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असल्याने त्याला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.”
Also Read : ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करावे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राज्यातील एक निर्णायक राजकीय शक्ती म्हणून पुढे येईल. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, बेरोजगार, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे. सरकारला जनतेच्या प्रश्नांवर धारेवर धरण्याची भूमिका पक्ष प्रभावीपणे बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मल्लीनाथ सोनकांबळे, ऐरोली तालुका अध्यक्ष राजेश भालेराव, मिलिंद लहाने आणि अनिल अंगरख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात विक्रांत कांबळे, सुरेश शिवशरण, महेश बनसोडे, पवन सोनवणे, विजय चंदनशिवे, स्वप्निल पवार, संतोष सकपाळ, यशवंत म्हस्के, तुळशीराम भोसले, भास्कर सरदार, हरी कट्टीमनी, गायकवाड, सतीश शिवशरण, शुभम शिंदे, निहाल शिशुपाल, दिनेश गुप्ता, मोनू मोर्या, गौतम जैस्वार, दिलीप मुंडेनकेरी, रोशन म्हस्के, गणेश अंगरख, संजय जैस्वार, बाबला मुन्ना आणि सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला. शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ईश्वरनगर, दिघा परिसरात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र यावेळी दिसून आले.






