मुंबई – हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 9 आणि 10 जून रोजी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये पश्चिम घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या 100 वर्षात पडला नाही, येवढा मोठ्या प्रमाणात पाऊस यंदा एकट्या 2025 च्या मे महिन्यात पडला. मात्र त्यानंतर जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये मान्सून राज्यातून गायब झाला आहे. यंदा राज्यात मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या वर्षी 26 मे रोजी वेळेआधी 15 दिवस मान्सून राज्यात दाखल झाला होता. मात्र मान्सूनने जून महिन्यातील पहिल्या दहा दिवस थोडी विश्रांती घेतल्याचे पहायला मिळाले. सध्या राज्यातील शेतकरी मान्सून सक्रीय कधी होणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत. तर दुसरीकडे मान्सून अभावी राज्यातील सर्वच पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विभागातील शेतकरी मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत.