वडवणी, बीड : बीड जिल्ह्यासह वडवणी तालुक्यात पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली; मात्र मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी, वडवणी तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली.
याबाबत तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक तसेच मानसिक संकटात सापडला आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पिकांचे पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच ग्रामीण भागातील शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी रोजगाराची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन तालुका व जिल्ह्यातील तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा आरक्षित ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे वडवणी तालुकाध्यक्ष विनोद काकडे, तालुका उपाध्यक्ष निखिल तांगडे, अविनाश साळवे, विकास डोंगरे, राजकुमार वाघमारे, राहुल डोंगरे, अविनाश माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





