अकोला : अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध हवामानविषयक माहिती, ढगांची उपलब्धता, वातावरणातील आर्द्रता आणि अन्य वैज्ञानिक निकषांचा अभ्यास करून कृत्रिम पाऊस (Cloud Seeding) पाडण्याची तांत्रिक शक्यता तातडीने तपासावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पावसाअभावी खरीप पिकांवर होणारा परिणाम, संभाव्य पीकनुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, पशुधनासाठी चारा व पाण्याची समस्या तसेच शेतकरी आणि ग्रामीण जनतेसमोरील संभाव्य संकटाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
अकोला जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभाग तसेच संबंधित तज्ज्ञ हवामान व वैज्ञानिक संस्थांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम पर्जन्यवृष्टीची शक्यता तपासण्यासाठी तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती उपलब्ध असल्यास महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून अकोला जिल्ह्यात क्लाऊड सीडिंगचा प्रायोगिक अथवा आपत्कालीन कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कृत्रिम पाऊस पाडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यास किंवा योग्य ढग उपलब्ध नसल्यास पावसाअभावी निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई, पिकांची स्थिती, चारा उपलब्धता, पशुधनाची परिस्थिती आणि संभाव्य पीकनुकसान यांचे तालुकानिहाय तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
– अकोला जिल्ह्यातील सध्याच्या पर्जन्यमानाचा व हवामान परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा.
– भारतीय हवामान विभाग व संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाने क्लाऊड सीडिंगची तांत्रिक शक्यता तपासावी.
– तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवून कृत्रिम पर्जन्यवृष्टीचा कार्यक्रम राबवावा.
– पावसाअभावी बाधित गावांचे तालुकानिहाय सर्वेक्षण करावे.
– पिकांच्या संभाव्य नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण तातडीने सुरू करावे.
– संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय पाणी आराखडा तयार करून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी.
– पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.
– परिस्थिती गंभीर झाल्यास नियमानुसार दुष्काळ किंवा दुष्काळसदृश उपाययोजना व शासकीय मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवावा.
– परिस्थितीचा नियमित आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची यंत्रणा सक्रिय करावी.
या निवेदनावर तातडीने कार्यवाही करून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती निवेदकांना देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण जनता आणि पशुधनाचे हित लक्षात घेऊन ही बाब अत्यंत तातडीची समजून वैज्ञानिकदृष्ट्या कृत्रिम पावसाची शक्यता तपासावी आणि पावसाअभावी निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीने केली.
या निवेदनाच्या प्रतिलिपी विभागीय आयुक्त, अमरावती विभाग; आयुक्त, कृषी विभाग; सचिव, महसूल व वन विभाग; सचिव, कृषी विभाग तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांना देण्यात आल्या.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, माजी जि. प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, महानगर अध्यक्ष मजहर खान, महानगर महासचिव गजानन गवई, दामोदर जगताप, अशोक शिरसाट, संजय नाईक, नगरसेवक पराग गवई, विकास सदांशिव, सिद्धार्थ शिरसाट, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, गोरसिंग राठोड, शुद्धोधन इंगळे, महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी वानखडे, ज्योती खिल्लारे, युवा तालुकाध्यक्ष मिलिंद दामोदर, आकाश जंजाळ, जय रामा तायडे, नागेश उमाळे, अमोल वानखडे, सूरज दामोदर, रुग्णसेवक नितीन सपकाळ, जनार्दन गवई, पवन डोंगरे, राजेश बोदडे, संजय गवई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





