औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय स्वतः नियमावली (गाईडलाईन्स) तयार करून एसआयटीने तपास कशा पद्धतीने पुढे न्यावा, याबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) सोशल मीडिया खात्यावर याबाबत माहिती देताना सांगितले की, यापूर्वीच्या दोन निर्णयांमध्ये सरकारचे जीआर (शासकीय ठराव) न्यायालयाने अमान्य केले होते. तसेच १२ जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आवश्यक असल्यास स्वतः नियम तयार करण्याचे संकेत दिले होते.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन शासकीय ठराव सादर करत या प्रकरणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या ठरावाला नियमावलीशिवाय कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयासमोर नोंदविण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने याच मुद्द्यावर पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
पुढील सुनावणीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण न्यायालयाने पुढे कोणत्या पद्धतीने हाताळावे, यासाठी आवश्यक नियमावली तयार केली जाईल. तसेच एसआयटीने तपास कोणत्या दिशेने आणि कोणत्या प्रक्रियेनुसार पुढे न्यावा, याबाबतही न्यायालय मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे या प्रकरणाला दोन वर्षे उलटूनही ठोस प्रगती झालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार असून, त्या वेळी न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्याची शक्यता आहे.




