रेणापूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बंदच्या पार्श्वभूमीवर पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ तसेच महाविद्यालये आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या. व्यापारी, नागरिक आणि विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवत नागरिकांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा असल्याचे यावेळी नागरिकांनी स्पष्ट केले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे रेणापूर तालुकाध्यक्ष आर. के. आचार्य, माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कांबळे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



