उस्मानाबाद : नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थी, महिला व आंदोलक यांच्यावर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिवसह जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शांततापूर्ण दि.२३ जुलै रोजी बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर काही शाळांनी सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची संभाव्य त्रासापासून सुटका होण्यास मदत झाली.
महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी व शाळा संस्थाचालक तसेच खाजगी वाहनधारक यांना या बंदमध्ये सहभाग नोंदवून देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या जुलमी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवावा असे आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नाहीत. मात्र, मेडिकल व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना या मधून वगळण्यात आले होते. शहरातील दुकाने बंद असल्याने कुठलेही व्यवहार झाले नाहीत. तर बाहेर गावाहून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न आणणे पसंद केले.
धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी शांततामय वातावरणात दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
या बंद आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला रिपब्लिकन पार्टी खरात गट, रिपब्लिकन सेना काॅंग्रेसने पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि एस.टी. महामंडळ विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये आंदोलन संविधानिक, लोकशाही व पूर्णतः शांततापूर्ण मार्गाने पार पडणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली होती.
यावेळी विकास बनसोडे, भैय्यासाहेब नागटिळे, नंदकुमार हावळे, भाई फुलचंद गायकवाड, प्रा. के. टी. गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे विजय बनसोडे, धनंजय वाघमारे, सचिन दिलपाक, रोहित बनसोडे, अक्षय बनसोडे, कुंदन वाघमारे, बंटी वाघमारे, यशपाल गायकवाड, सुजाता बनसोडे, सुनिल वाघमारे, विरेंद्र झेंडे, आनंद गाडे, रमेश गंगावणे, बप्पा शिंदे, राजा राऊत, काश्यप बनसोडे, प्रतीक गंगावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, वाहनचालक, शेतकरी, कामगार, विविध सामाजिक संघटना आणि संविधान प्रेमी नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


