मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै २०२६ रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाण आणि अन्यायाच्या विरोधात तसेच चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै २०२६ रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे. या बंद आंदोलनाला डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. (Maharashtra bandh)
या आंदोलनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) आणि समता सैनिक दल (महाराष्ट्र व मुंबई) पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी वादी समाज, समविचारी संघटना आणि संस्थांनी प्रचंड संख्येने व शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती समता सैनिक दल केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख, ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.




