नांदेड : दिल्ली येथे विद्यार्थी व आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे गटनेते इंजी. प्रशांत विराज इंगोले यांनी केले आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक, नांदेड यांना निवेदन सादर करण्यात आले असून नांदेड बंद शांततापूर्ण, संविधानिक व लोकशाही मार्गाने पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही तसेच सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इंजी. इंगोले यांनी व्यापारी, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. हा बंद कोणत्याही व्यक्ती किंवा घटकाविरोधात नसून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच रुग्णालये, ॲम्बुलन्स सेवा, औषध दुकाने व इतर अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील आणि त्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी शांतता, संयम आणि संविधानिक मूल्यांचे पालन करत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही इंजी. प्रशांत विराज इंगोले यांनी केले आहे.





