मुंबई: ‘शिवरायांचे अंगरक्षक’ वीर जिवाजी महाले यांचे प्रतापगडावर भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीला अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यभरात घेतलेल्या सत्ता संपादन मेळाव्यांमध्ये या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांच्या या संघर्षाला अखेर मोठे यश आले असून शासनाला झुकून या मागणीची दखल घ्यावी लागली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीने केवळ भाषणांपुरती ही मागणी मर्यादित न ठेवता, आपल्या अधिकृत धोरणातही याला अग्रक्रम दिला होता. २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यात यावे आणि त्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. पक्षाच्या याच आक्रमक भूमिकेमुळे अखेर शासनाने हा निर्णय घेतला आहे. (Veer Jivaji Mahale)
Also Read : ‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
याविषयी अधिक माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे म्हणाले की, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर झालेल्या सत्ता संपादन मेळाव्यांमध्ये वेळोवेळी वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी अत्यंत लावून धरली होती. वंचितच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अखेर शासनाला या न्याय्य मागणीची दखल घ्यावी लागली आणि स्मारकाची मागणी मान्य करावी लागली.
‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ असा इतिहास घडवणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याला योग्य सन्मान मिळावा, ही बहुजन समाजाची अनेक वर्षांची भावना होती. वंचित बहुजन आघाडीने या भावनेला राजकीय आणि सामाजिक पटलावर मुख्य प्रवाहात आणले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा लढा यशस्वी केल्याबद्दल बहुजन समाजातून ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले जात आहेत. (Veer Jivaji Mahale)






