Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रडे येथे १४ एप्रिल रोजी घडलेल्या दगडफेक प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दलित बांधवांवर दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान टाकळी प्रदे येथील १४ एप्रिलच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. काही समाजकंटकांकडून दगडफेक घडवून आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप कांबळे यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी “तू तोच का संदीप कांबळे, थांब तुझा कार्यक्रम लावतो,” अशा शब्दांत धमकी देत तणाव निर्माण करणारे वक्तव्य केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून दलित बांधवांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हे गुन्हे मागे घ्यावेत, संबंधितांवर कारवाई व्हावी आणि दलित समाजावर अन्याय करणाऱ्यांना संरक्षण देऊ नये, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
या मोर्चात राज्य कार्यकारिणी सदस्य शमिभाताई पाटील, ईश्वर पाटील (लाला सर), जिल्हाध्यक्ष पश्चिम शंकर अण्णा खरात, धुळे जिल्हा संघटक आबा निकुभे, नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष अमित तडवी, जळगाव पश्चिम महासचिव राहुल इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल दादा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष दयाराम मोरे, पारोळा तालुकाध्यक्ष संदीप जाधव, पाचोरा तालुकाध्यक्ष गोकुळ सन्सारे, भडगाव तालुकाध्यक्ष हसराज पगारे, तालुका महासचिव चेतन पवार, तालुका उपाध्यक्ष विकास बागुल, उपाध्यक्ष कलीम सय्यद, संघटक सुरेश जगताप, सागर देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






