Nagpur : महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्य निधी तातडीने वितरित करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नागपूर जिल्ह्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे 20 हजार गरजू लाभार्थी अर्थसहाय्य निधीपासून वंचित आहेत. निराधार ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच इतर लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून ही मदत दिली जाते. मात्र निधी न मिळाल्याने अनेकांना मूलभूत गरजा भागविणे कठीण झाले आहे.
तसेच लाभार्थ्यांना तहसील कार्यालय व बँकांच्या वारंवार चकरा माराव्या लागत असून, त्यामुळे ते त्रस्त झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गरजू लाभार्थ्यांचा प्रलंबित निधी तातडीने मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने आदी उपस्थित होते.






