नागपूर: राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विशेषतः विदर्भात उष्णलहरींचा प्रभाव तीव्र होत चालला असून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी व कामगारांनी उष्णतेपासून संरक्षणाची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विदर्भात उष्णलहरींचा हा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






