सह कुटुंब भेट घेऊन घेतले आशीर्वाद
नवी दिल्ली : संविधानाच्या सर्वोच्च मूल्यांची शपथ घेऊन देशातील न्यायव्यवस्थेच्या उच्च पदावर विराजमान झालेल्या माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कृतीमुळे सध्या समाजात तीव्र चर्चा रंगली आहे. हिंदूराष्ट्राची उघडपणे वलग्ना करणाऱ्या आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बागेश्वर धाम येथे त्यांनी कुटुंबासह भेट दिल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या धामाचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या कथित चमत्कारांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या देशात, अशा ठिकाणी जाऊन विधी करणे ही केवळ वैयक्तिक श्रद्धा नसून सार्वजनिक संदेश देणारी कृती ठरते. त्यामुळे “संविधान की श्रद्धा?” असा थेट सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या मंचावर उपस्थिती लावून मा. न्यायमूर्ती सामान्य नागरिकांपर्यंत नेमका कोणता संदेश पोहोचतो? ही कृती प्रत्यक्षपणे अंधश्रद्धेला वैधता देणारी ठरत नाही का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले आहे, “संविधानाच्या बळावर मोठ्या पदावर पोहोचलेल्या व्यक्तींनीच जर अंधश्रद्धेच्या बाजूने उभे राहायचे असेल, तर हा आंबेडकरी विचारधारेचा सरळ विश्वासघात आहे. समाजाने अशा दुटप्पी भूमिकांना ओळखून त्याला ठाम विरोध केला पाहिजे.”






