– सरोजिनी गांजरे लभाने
सम्राट अशोक यांचे नाव भारत देशामध्ये सर्वप्रथम घेतल्या जाते, कारण देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या अशा संस्कृतीशी जोडलेली त्यांची नाळ आहे. भारत देशाच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र आणि देशाची राजमुद्रा ही अशोक राजाची या देशाची ओळख करून देते. असा हा प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या नावापुढे ‘देवांना प्रिय’ अशी उपाधी लावण्यात येते.
मौर्य साम्राज्य प्राचीन भारताचे प्रगल्भ आणि समृद्ध असे राजांचे साम्राज्य होऊन गेले. त्यामध्ये प्रसेनजित, बिंबिसार, अशोक मौर्य आणि इतर खूप सारे होऊन गेले. अशोकाचे चक्रवर्तीत्व अफाट होते. त्यांना चक्रवर्ती ही उपाधी दिल्या गेली, हे मि. व्हिन्सेंट स्मिथ सारख्या पाश्चात्य इतिहासकारांनी सुद्धा मान्य केले आहे.
अशोकाचा महाभारत याच्यासाठी म्हटले जाते की त्यांचा कार्यकाल क्षेत्र बघता असे लक्षात येते की अफगाणिस्तान, बलुचिस्तान पासून भारत, चोल, पांड्य, योन, गांधार, पितनिक, आंध्र, कलिंग, भोज, पुल्लिंग, ताम्रपर्णी वगैरे लहान राज्य होती व या सगळ्या लहान राज्याचे महाराजे अशोकाचे मांडलिकत्व पत्करून राहिलेले होते. सामील आताच्या पाकिस्तान होय. यामुळे अशोकाला हिंदुस्थानचा पहिला चक्रवर्ती राजा किंवा सम्राट हे उपपद लावण्याचे यथाकिंचितही अतिशयोक्ती विधान केल्याचा दोष कोणाला लावता येणार नाही.
आजपासून अडीच हजार वर्षे सुवर्णाक्षरांनी अंकित व अविस्मरणीय होऊन राहिले आहे ते त्यांच्या बौद्ध धम्माच्या आणि शांतीच्या संदेशाच्या कारणामुळे. या गोष्टीतच अशोकाच्या कीर्तीचे व यशस्वीतेचे खरे रहस्य आहे. अशोकाच्या राजशक्तीचे पाठबळ बौद्ध धर्माला दिल्यामुळे अल्पकाळात त्या धर्माचा इतका प्रसार झाला की तसा त्याच्या पूर्वीच्या किंवा नंतरच्या काळात कधीच झाला नव्हता. आज सुद्धा पृथ्वीच्या पाठीवर लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्माचा नंबर तिसरा लागलेला दिसत आहे. जगात 33% लोकसंख्या बौद्ध धम्माची आहे. तो सद्धम्म आहे. याचे श्रेय फक्त आणि फक्त सम्राट अशोकांना दिल्या जाते.
अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी महिला आणि पुरुष दोघांचाही भिक्खू संघ स्थापन करण्यात आलेला होता. प्रामुख्याने त्यांनी स्वतःच्या मुलीला संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेसारख्या देशामध्ये पाठविल्या गेले. बौद्ध धम्म प्रचाराचे मोठे श्रेय मौर्य साम्राज्याला खूप मोठ्या प्रमाणात दिल्या जाते. “एखाद्याचे नाव त्याच्या पश्चात जितक्या जास्त लोकात जास्त काळपर्यंत वंद्य होऊन राहील तितकी त्याची योग्यता थोरात समजावी” हे पश्चिमात्य इतिहास प्रसिद्ध सिझर व शार्लन यांनी सुद्धा कबूल केले आहे. अशोकाच्या अंगाच्या अनेक गुणांच्या समुच्चयामुळे तो सर्व इतिहास प्रसिद्ध पुरुषांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ ठरतो.
अशोकाचा कुलवृत्तांत पाहता नागवंशीय राजा होता. शिशुनाग आणि नागवंशीय राजे या देशांमध्ये होऊन गेले. शिशुनाग हा ई.स.पूर्व सातव्या शतकात होऊन गेला व त्याचे मगध देशावर 40 वर्षांपर्यंत राज्य होते. याचे पुरावे आपण महाभारत, रामायण व हरिवंश या ग्रंथातूनही आहेत. मगध देशाचा राजा जरासंध यांच्या वेळी गिरीवज्र ही राजधानी होती, असे सांगितले आहे. मगधचा राजा बिंदुसार हा शिशुनाग वंशातला पाचवा पुरुष होऊन गेला. हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. यांच्या विषयी अशी माहिती मिळते की या राजाने जुन्या राजगृह राजधानीचा त्याग करून ती राजधानी ज्या डोंगरावर बसलेली होती, त्याच्या दुसऱ्या बाजूला पायथ्याशी राजगृह हेच नाव नंतर देऊन ते कायम ठेवून नवे शहर वसवले आणि ते राजधानीचे ठिकाण केले. असा उल्लेख इसवी सनाच्या पाचव्या शतकात आलेल्या फाहयान चिनी प्रवाश्याने आपल्या प्रवासवृत्तामध्ये लिहून ठेवलेला आहे.
बिंदुसार, शिशुनाग, कणिष्क, अजातशत्रू मौर्य साम्राज्याची राजे होते. त्यांची राजधानी पाटलीपुत्र आजच्या ‘पाटणा’ शहर हिरण्वती उर्फ शोणभद्रा आणि भागीरथी उर्फ गंगा नदी यांच्या संगमावर बसलेली होती. अशोक राज्याच्या काळामध्ये पशुंसाठी वैद्यकीय सेवा, वैद्यकसेवा, आयुर्वेदशास्त्र, गावांची व रस्त्यांची स्वच्छता राखणे, दळणवळणाच्या नव्या सोयी करणे, प्रवासी लोकांना उतरवण्यासाठी धर्मशाळा वगैरे बांधणे व त्यांची व्यवस्था पाहणे, भारतातील लेणी हे दळणवळणाच्या आणि ज्ञानदानाच्या कार्यासाठी वापरल्या जात होत्या. विहिरी, तलाव इत्यादी खोदणे व त्यांची दुरुस्ती राखणे, ग्रामसभा गावकऱ्यांना एकत्र जमवून विचार करण्यासाठी (टाऊन हॉल) सारखे सभागृह बांधणे ह्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिल्या जात होते. आजही आपण बौद्धकालीन भुयारी मार्ग, पायऱ्यांच्या विहिरी आणि मंदिरे, धम्म प्रवचनासाठी मोठे मोठे सभागृह मौर्यकालीन महाराष्ट्रामध्ये बघतो.
त्याचप्रमाणे बौद्धकालीन जी विद्यापीठे जगातील नामांकित अशी आहेत, त्यामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला आहेत. महाराष्ट्रातील अजंठा, पितळखोरा, वेरूळ, भाज्या, कारला, त्रिरश्मी लेणी नाशिक यासारख्या लेण्यांमध्ये ज्ञानदानाचे कार्य आजही असल्याचे पुरावे बघायला मिळते. त्यामध्ये योगशास्त्र, अष्टांगयोग, चित्रकला, वैद्यकशास्त्र, संख्याशास्त्र, वनस्पतीशास्त्र या आजच्या शास्त्रांचा संपूर्ण जगातून विद्यार्थ्यांचा कल हा भारतामध्ये होता. विद्येची मोठमोठी केंद्रे होती. संस्कृती, राज्य विस्तार, स्त्री शिक्षण, राज्य पद्धती, सैन्य, सामान्य लोकस्थिती, औद्योगिक स्थिती, युद्धनीती, परराष्ट्रीय संबंध व राजनीती या सगळ्या गोष्टी अशोक राज्याच्या मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये कटाक्षाने पाळल्या जात होत्या.
अजिंठा लेणीमध्ये इको साउंड सिस्टमच्या लेण्या आहेत. त्याचप्रमाणे नर्स कशी असावी याचे चित्र सुद्धा तिथे वैद्यकशास्त्राची देण आहे. बाराव्या लेणीमध्ये छताच्या मध्ये एक हूक आहे, ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये फॅन लटकवण्यासाठी हूक लावलेला असतो अगदी तसाच. पाली भाषेमध्ये एक शिलालेख आहे. त्याच्यावरती स्त्रीप्रधान संस्कृतीचा लेख सुद्धा आहे. भारताच्या इतिहासात बौद्ध संस्कृतीचे फार मोठे योगदान आहे. आज आपल्या देशामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये 8000 लेण्या, स्तूप, स्तंभ, विहार, चैत्य ह्या बौद्ध साम्राज्याची प्रगल्भ संस्कृती आपण बघतो. ह्या सगळ्यांमध्ये ज्ञानदानाचे कार्य, मानवतावाद, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, जातीविरहित शिक्षणाचे केंद्र प्राचीन होते. गौरवशाली संस्कृती आहे.
आपल्याला संस्कृतीचा अभिमान वाटायला पाहिजे की जगातील पहिले ज्ञानदानाचे केंद्र हे भारतामध्ये होते. नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, वल्लभी यांसारखी विद्यापीठे भारतामध्ये असताना आपण त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास करत नाही. याचे कारण म्हणजे या देशात विषमतावादी संस्कृतीने बरबटलेले धर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि पौराणिक कथांवर आधारलेली मानसिकता आहे. बौद्ध धम्माचा ह्रास झाला. याचे मूळ कारण म्हणजे येथील चातुर्वर्ण व्यवस्थेवर, विषमतेवर आधारित हिंदू संस्कृती आहे. बौद्ध धम्मामध्ये राजापासून प्रजेपर्यंत बोलण्याची एकच भाषा होती, ती लोकभाषा म्हणजे पाली आहे. स्त्री-पुरुष समानता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मांधता, लोकशाही बौद्ध धम्म देतो.
ही शिकवण, हे शिक्षण शास्त्राच्या बी.एड.ला अभ्यासाला असताना आपण एखाद्या महिलेला विचारले किंवा सांगितले की हे आपले भारतातील प्रगल्भ असे विद्यापीठ बौद्धकालीन होते, तर तिला फार राग येतो. कारण बौद्ध संस्कृती ही या देशातील प्राचीन संस्कृती आहे हेच आपण विसरलेलो आहोत. स्त्रियांच्या डोक्यामधून आजही बौद्ध संस्कृती या देशातील मानवतावादी पहिली संस्कृती आहे ही गोष्ट स्वीकारायला तयार नाही. कारण तिच्यावरती पुराणकथा आणि धार्मिकतेचा मोठा पगडा पडलेला आहे. ती स्वच्छ डोळ्यांनी बघत नाही. त्यामुळे या देशातले समता, स्वातंत्र्य आणि बंधुता सांगणारा बौद्ध धर्म हा लोप पावलेला आहे. येथील खूप मोठा वर्ग बहुजन, आदिवासी आणि स्त्रिया आहे.
या देशातील तिरंग्यावरील अशोक चक्र आणि राजमुद्रा ही कुठून आली, कशी आली, का आली याचा विचारही कधी करत नाही. हे तुम्ही हायर (उच्च) एज्युकेशन घेतलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचाराल, त्यालाही हा साधा इतिहास येत नाही. याचे कारण आपण पुराणकथा, काल्पनिकतेवर आधारित समाजव्यवस्थेमध्ये गुंतलेलो आहोत. विचारशास्त्र विभाग हा सम्राट अशोककालीन बहुजन समाजापर्यंत पोहोचलेला आजही नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या आईचे नाव शुभरतराणी, वडील राजा बिंदुसार. विशाल भारत वंशातील मौर्यकालीन असे महान राजा झाले. विश्वभरचे सगळे विद्वान त्यांच्याप्रती “महान” हा शब्द लावतात.
परंतु त्यांच्या जयंतीला भारतामध्ये सार्वजनिक सुट्टी नसते. त्यांचा जन्म हा बिहारमधील पाटलीपुत्र, आजचे पटना येथे झालेला होता. ज्या सम्राटाचे राजचिन्ह अशोक चक्र हे आपल्या देशाच्या तिरंगा ध्वजावर आहे, चार मुखी सिंह हे भारतीय राज्यचिन्ह म्हणून वापरतात, “सत्यमेव जयते” याला त्यांनी मान दिला आहे. ही सगळी देण सम्राट अशोकाची आहे. ज्या देशामध्ये सेनेचे सगळ्यात मोठे युद्ध जिंकून आणले, त्याला सन्मानित करण्यासाठी सम्राट अशोकाच्या नावावरून अशोक चक्र दिले जाते. ज्या सम्राटाच्या अगोदर आणि नंतर असा राजा झाला नाही, त्या सम्राटाचे राज्य नेपाळ, बांगलादेश, पूर्व भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान या सर्व देशांमध्ये विस्तारलेले होते.
याच सम्राट अशोकाच्या काळामध्ये 23 विद्यापीठे, तीही जागतिक स्तराची निर्माण करण्यात आली होती. तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला, गांधार ही प्रमुख विद्यापीठे होती. या विद्यापीठांमध्ये विदेशातील विद्यार्थी सुद्धा शिकण्यासाठी येत होते. भारत हे मानवतावादी विश्वगुरू होते.
याच देशाला बौद्धकालीन “सोन्याची चिडिया” म्हटले जायचे. या काळामध्ये येथील जनता समता, कुशल आणि सुखी, बंधुभावाने राहत होती. त्यांच्या शासनकाळामध्ये दोन्ही रस्त्यांनी मोठमोठी झाडे लावलेली होती.
एवढ्या मोठ्या महान राजाची आठवण आपण विसरलो, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. म्हणून या देशातील विद्वान, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या महान धम्माला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बौद्ध धम्माची आपल्या अनुयायांसोबत अशोक विजयादशमीच्या दिवशी परत दीक्षा घेऊन देशाला आठवण करून दिली. बाबासाहेबांचे हे महान कार्य इतिहासामध्ये तोड नाही. बौद्ध धम्माची दीक्षा देऊन पुन्हा प्राचीन अशा बौद्ध धम्माला जीवनदान देण्याचे कार्य झाले.
ज्या देशामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण दिले जायचे, अशी विद्यापीठे त्यांचे अवशेष आजही आपण बघतो आहोत. अशोककालीन विचारशास्त्र विभाग हा संपूर्ण मानवी जीवनातून नाहीसा झालेला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या मागे जास्त लोक जाताना दिसतात, हे वास्तव आहे. या ठिकाणी जे माझे मत स्पष्ट शब्दात मांडले, विचार करावा हीच माझी एक आपणास विनंती आहे. पुन्हा आपणास सर्वांना प्रियदर्शी महान सम्राट अशोक राजाच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते.






