पालघर : भारतीय संविधानाने दिलेल्या बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांना जपत वंचित बहुजन आघाडी (वं.ब.आ.) आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी नालासोपारा (पूर्व) येथील प्रगती नगरमधील के.जी.एन. अपार्टमेंट येथे भव्य ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध समाजघटकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे आयोजन जनाब फिरोज शेख आणि जनाब सुविध पवार यांनी केले होते. तसेच या उपक्रमाला ११ स्टार नव जीवन ग्रुपचे जनाब नासिर शेख यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. (Iftar Event in Nalasopara)

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांवर भाष्य करताना सांगितले की, इफ्तार हा केवळ उपवास सोडण्याचा विधी नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा प्रेम, विश्वास आणि बंधुभावाचा धागा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी अशा एकात्मतेच्या उपक्रमांमधून पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. नालासोपाऱ्यातील या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्याचे प्रभावी उदाहरण निर्माण केले आहे.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हा प्रभारी सुप्रेश खैरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वं.ब.आ. व.वि.श.म.चे महासचिव मिलिंद सोमा कांबळे, सल्लागार दिलीप साळुंखे, संजय जैन, गणेश चव्हाण उपस्थित होते. (Iftar Event in Nalasopara)

तसेच वं.ब.आ. विरार शहर अध्यक्ष अभिजित खैरे, जनार्दन तांबे, वं.ब.आ. अजीव सभासद मिराज शेख आणि त्यांची टीम, सचिव बिपीन रुके, उद्योजक सुभाष धवणे, वं.ब.आ. व.वि.श.म. उपाध्यक्षा प्रेरणा भेकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सरचिटणीस मनोज खाडे, तुषार जाधव, दिनेश मोहिते यांच्यासह परिसरातील मौलाना आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान हिंदू, मुस्लिम आणि बहुजन समाजातील बांधवांनी एकत्र बसून इफ्तार केला. प्रगती नगर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि मौलानांनी सर्वसमावेशक कार्यक्रमाबद्दल आयोजक तसेच ११ स्टार नव जीवन ग्रुपचे विशेष आभार मानले.






