श्रीगोंदा : भटक्या विमुक्त आदिवासी समाजातील नागरिकांना कायदेशीर जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाखल्यांपासून वंचित ठेवत असल्याने लोकाधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर तीव्र उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणाची प्रशासनाने आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत दखल न घेतल्यास सर्व हक्कधारकांना सोबत घेऊन थेट अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर पायदळ ‘लाँग मार्च’ काढण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी दिला आहे. लोकाधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने सन २०२४ पासून भटक्या विमुक्त आदिवासी समाजातील नागरिकांना जातप्रमाणपत्र मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. (Shrigonda Protest)
मात्र, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या संदर्भात श्रीगोंद्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता, हा विषय प्रांत अधिकारी यांच्या अखत्यारीतील आहे, असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या अन्यायाविरोधात सुरू असलेल्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी हक्काच्या दाखल्यांसाठी तब्बल ५०० विद्यार्थी उपस्थित होते. आज आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडला, तरीही तहसीलदार किंवा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दखल घेतलेली नाही.
Also Read : स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेमुळे आंदोलक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रीगोंदा तहसील प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्यास पायदळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करण्याचा निर्धार ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी व्यक्त केला आहे. हे आंदोलन लता शिंदे, उमामाई जाधव, पल्लवी शेलार, सारिका गोंडे यांच्या नेतृत्वात आणि ऍड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Shrigonda Protest)
याप्रसंगी अप्पासाहेब सोनवणे, राहुल छत्तीसे, नवनाथ शिंदे, अनिल चौरे, प्रवीण सुडगे, संतोष भोसले, जीवा घोडके, सुनीता बनकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष, विद्यार्थी आणि पत्रकार उपस्थित होते.





