पुणे : मावळ तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे भात, भाजीपाला, फळबागा तसेच ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, तसेच पंचनाम्यांची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने मावळ तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. (Crop Loss Survey)
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने पंचनामे पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित केली असली तरी मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचनाम्यांची मुदत वाढविण्यात यावी, उर्वरित गावांतील पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
Also Read : NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट
यावेळी तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (Crop Loss Survey)
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, युवा अध्यक्ष संदीप कदम, युवा महासचिव अक्षयदादा साळवे, महिला अध्यक्षा वृषाली वीरगुर्जर, महिला उपाध्यक्षा सुनिता कदम, महिला संघटक सुजाता गायकवाड तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते किसन गायकवाड उपस्थित होते.






