यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषद कार्यक्षेत्रात एकूण २९ प्रभाग असून ५८ नगरसेवक, ५ स्वीकृत सदस्य आणि १ नगराध्यक्ष अशी एकूण ६४ लोकप्रतिनिधींची व्यवस्था आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या साधारण ८ ते १० हजारांच्या आसपास असताना संपूर्ण शहराच्या मच्छर नियंत्रणासाठी नगरपरिषदेकडे केवळ एकच फॉगिंग मशीन असल्याची बाब समोर आली आहे.
एका प्रभागामध्ये प्रभावी फॉगिंग करण्यासाठी अनेक दिवस लागण्याची परिस्थिती असताना उपलब्ध मशीनही केवळ मर्यादित वेळ चालविली जाते. मशीन जास्त वेळ चालवल्यास ती गरम होण्याची समस्या निर्माण होते, अशी माहिती प्रशासनाकडून दिली जाते. त्यामुळे केवळ दोन तास मशीन चालवून एवढ्या मोठ्या शहराला मच्छरमुक्त करण्याचा नगरपरिषदेचा दावा हास्यास्पद असल्याची टीका होत आहे.
नगरपरिषद स्थापन होऊन आठ महिने पूर्ण झाले असतानाही मच्छर, मोकाट कुत्रे, मोकाट गाई-म्हशी आणि गाजर गवत यांसारख्या मूलभूत नागरी समस्यांवर अद्याप प्रभावी उपाययोजना झालेली नाही. छोट्या-छोट्या नागरी समस्यांचे निराकरण करण्यात नगरपरिषद अपयशी ठरत असेल, तर सर्वसामान्य यवतमाळकरांची सेवा प्रभावीपणे कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
याच निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यवतमाळकरांच्या आरोग्याची काळजी नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधारी घेत नसल्याने, किमान नगरपरिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मच्छर चावून मलेरिया किंवा डेंग्यूसारखे आजार होऊ नयेत, या उद्देशाने डॉ. नीरज वाघमारे यांनी स्वतः फॉगिंग मशीनद्वारे धुरफवारणी केली.
Also Read : “मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी कार्यालयापासून नगराध्यक्षांच्या कार्यालयासह विविध विभागांमध्ये फॉगिंग करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असताना, नगरपरिषदेतच फॉगिंग करण्याची वेळ नागरिकांच्या प्रतिनिधींवर येणे ही प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव आणि कारभाराचे अपयश दर्शविणारी बाब असल्याचे डॉ. नीरज वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
यवतमाळ शहरातील प्रत्येक प्रभागासाठी पुरेशा संख्येने अत्याधुनिक फॉगिंग मशीन उपलब्ध करून द्याव्यात, नियमित धुरफवारणीचे वेळापत्रक जाहीर करावे आणि मच्छर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळ करू नका; नगरपरिषदेला जागे करा!” असा इशारा देत यवतमाळकरांच्या मूलभूत नागरी प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे डॉ. नीरज वाघमारे यांनी स्पष्ट केले.





