यवतमाळ: दिल्ली येथील जंतर-मंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी दिलेल्या २३ जुलैला महाराष्ट्र बंदच्या हाकेला यवतमाळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात या बंदचे नियोजन करण्यात आले. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हजारो नागरिक एकत्र आले असून संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि संविधानिक पद्धतीने पार पडले.
या बंदमध्ये शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, खासगी शाळा, ऑटो-रिक्षा चालक-मालक, स्कूल बस चालक तसेच विविध व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. परिणामी शहरातील जनजीवन काही काळासाठी ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका केली, बेरोजगारी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी घटना असून विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर प्रमोदिनी रामटेके, नगरसेविका मीरा वीर, जावेद अन्सारी, राजा गणवीर, सत्यजित मेंढे, हर्षदीप कांबळे, नितेश मेश्राम, तेजस थूल, प्रियंका, उषा खंडारे, प्रा. पंढरी पाठे, ममता धारपवार, एम. के. कोडापे, प्रफुल शंभरकर, प्रसन्नजीत भवरे, सुजाता वावरे, चित्रा घोडेस्वार, गोपाल माकोडे, नारायण थूल यांच्यासह विविध विद्यार्थी प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटनांचे प्रतिनिधी, विशेष दिव्यांग चिमुकले विद्यार्थी तसेच दिल्ली येथील जंतर-मंतर आंदोलनात सहभागी झालेले यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा जाहीर केला.
या आंदोलनाला विविध सामाजिक, राजकीय व कर्मचारी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यामध्ये मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे नंदकुमार बुटे, शशिकांत खडसे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कुडूपले, शिक्षक संघटनेचे गौरीनंदन कन्नाके, काँग्रेसचे नगरसेवक जावेद अन्सारी, वानखडे करिअर अकादमीचे जगदीश वानखडे, अशोक हेलोंडे, शामा दादा, कोलाम ब्रिगेडचे सुरेश कुमरे, वर्षा निकम, शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे, सचिन मनवर, कृष्णा पुसनाके, ऑल इंडिया दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष सचिन खाडे, जुबेर सय्यद, आम आदमी पक्षाचे मोबीन शेख, आकाश चमेडिया, राजा गणवी, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे डोंगरे, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच सोशल मीडिया काँग्रेस कमिटी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. यावेळी प्रकाश दातार (समता सैनिक दल), जगदीश भितकर, गणोरी राजा गणवीर, ॲड. राहुल पाटील, रंजना ताकसांडे (भारतीय बौद्ध महासभा), विशाल पोले, सचिन राऊत, शैलेश भानवे, शिवदास कांबळे, संजय इंगळे, अशोक कयापाक, प्रसन्नजीत भवरे, प्रमोद पाटील, विलास वाघमारे, नितेश पाटील, उत्तम कांबळे, रामदास वीर, अरविंद दिवे, गजानन कोकाटे, हरिदास अघम, गोविंद चव्हाण, सुरज खोब्रागडे, पुष्पा शिरसाट, रत्नमाला कांबळे, भारती सावते, सविता तिडके, करुणा मून, करुणा चौधरी, शोभना कोटंबे, वंदना उरकुडे, सुकेशनी खोब्रागडे, उषाताई खंडारे आदी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच संविधानिक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. संपूर्ण आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. संविधानिक मार्गाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.




