– संजीव चांदोरकर
हे दुर्दैव आहे की अनेकजण …
अमीर खानचे तिसरे / चौथे / पाचवे लग्न (किंवा तत्सम अनेक क्षेत्रातील सेलिब्रटीनच्या) रिलेशनशिप, विभक्त होणे याबद्दल तासन्तास रवंथ करत बसतात;
पण आपल्या समाजात , देशात अनेक तरुणांची लग्ने न होण्याची मुळे इथल्या आर्थिक, शेती, रोजगार विषयक धोरणात आहेत याचे त्यांना भान देखील नसते.
फालतू मराठी टीव्ही सिरियल्स मधील स्त्री पुरुषांच्या लफड्यांवर चर्चा करत तासन्तास घालवत असतात
पण आपल्या स्वतःच्या किंवा आजूबाजूच्या अनेक संसारातील ताणतणाव यांची मुळे आर्थिक ओढग्रस्ती, घरांचे प्रश्न, आहेत याबद्दल ते अनभिज्ञ असतात
“क्ष” नावाच्या नटीच्या मुलीने कसे बाळसे धरले किंवा “य” नटी किती महिन्याची प्रेग्नन्ट आहे याची सोशल मीडियावरील क्लिप्स / तत्सम बातम्यांवर भरभरून गप्पा मारतात
पण स्वतःच्या अर्भकाचे भरणं पोषण, आपल्या आजूबाजूला लहान मुले सारखी आजारी का पडतात, याचा कल्याणकारी राज्य लयाला जाण्याशी काही संबंध आहे हा विचार त्यांच्या मनाला शिवत देखील नाही
हॉस्पिटलमध्ये असणारा कोणी सुपरस्टार लवकर बरा व्हावा म्हणून झुंडीने पहाटे ३ वाजता कोणत्या तरी देवळात चालत जायचा आचरटपणा करतील
पण घरातील कुटुंबियांच्या आजारपणात आपली आर्थिक ओढाताण होते त्याची मुळे सरकारी हॉस्पिटल्स बंद केल्यामुळे आपल्याला खाजगी हॉस्पिटल्स मध्ये आपल्याला हजारो लाखो रुपये भरावे लागणे यामध्ये आहेत हे काही त्यांच्या लक्षात येत नाही
ही फक्त काही उदाहरण. अनेक देता येतील. उदा नेत्याची larger than life प्रतिमा बनवून त्याचे भक्त तयार होणे…..
हे सर्व खूप खोलवर, पिढ्यन्पिढया रुजवले गेले आहे
उच्च / ब्राह्मण जातीत जन्मलेल्या व्यक्ती , जमीनदार , राजा , कंपनीचा मालक , राजकीय नेता हि दैवी माणसे आहेत आणि आपण जन्तू , किडा मुंगी , क्षुद्र आहोत , म्हणजे जन्मापासूनच तसे आहोत. आपण तसेच मरणार आहोत. तेच आपले भागधेय आहे. हेच विचार पार त्यांच्या डीएनए मध्ये पिढ्यानपिढ्या ठोकून ठोकून बसवलेले असतात !
त्यामुळे आपल्या साऱ्या जीवनमरणाच्या भौतिक प्रश्नांची बिले ही लोक नशीब/ मागच्या जन्मीचे पाप/ देवाने बनवलेल्या जाती/ पाऊस / निसर्ग / जागतिक युद्ध / डोनाल्ड ट्रम्प / कोरोना (सार्वजनिक आरोग्यसेवा नाही) / आपल्या देशाची लोकसंख्या / भ्रष्टाचार हा बदचारीत्र्याच्या व्यक्तींमुळे होतो / सरकार कडे पैसेच नाहीत तर सरकार तरी काय करणार …. यावर फाडतात.
आपल्या भौतिक प्रश्नांची मुळे विशिष्ट मानव निर्मित सिस्टीममध्ये आहेत, शासकीय ओमिशन वा कमिशन मुळे आपले प्रश्न काही पटींनी गंभीर बनतात असे विचार त्यांच्या मनाला शिवत नाहीत कारण
मी आणि माझ्यासारखे असंख्य राजकीय शिक्षण, अर्थ साक्षरता आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला मर्यादा आहेत.
कोट्यावधी लोकांना आपण देखील माणूस आहोत. कोणत्याही सेलिब्रटीच्या एवढीच आपली स्वतःची स्वप्ने / आपली स्वतःची लहान मुले सुंदर आहेत, ती स्वप्ने प्रत्यक्षात आणणे आपला घटनादत्त मूलभूत हक्क आहे, आपण एकेकटे कमी पडू. पण या प्रश्नात सामुदायिकपणे हस्तक्षेप करून आपल्याला हवी तशी धोरणे शासनाकडून आखून घेऊ शकतो ही जाणीव त्याच्यामध्ये तयार होणे त्यापेक्षा महत्वाचे आहे.
त्यासाठी लोकांच्या आत्मसम्मानाच्या भावना चेतवणे , आजूबाजूची, दुसऱ्या राज्यातील / अगदी दुसऱ्या देशातील अनके उदाहरणे देत त्यांचा आत्मविश्वास जागवणे हे काम अर्थ साक्षरतेपेक्षा बेसिक आहे.
ते काम कवी, कथा , आत्मचरित्रकार, कांदबरी, पोवाडे, रॅप सिंगर्स, फिल्म मेकर्स , एकांकिका / नाटककार, युट्यूबरस, सोशल मीडियावरील लिखाण करणारे, वस्त्यांमधील स्त्रिया , तरुणांच्या नाक्यावरील , कट्यावरील ओपिनियन मेकर्स करू शकतात.
वैचारिक काम महत्वाचे असतेच. पण ते सकस बियाण्यासारखे. त्या बिया रुजण्यासाठी जमीन नांगरणी, वेळ पडली तर बाहेरून माती आणून घालणं, पूर्वअट आहे.






