नवी मुंबई : रबाळे येथील आदिवासीपाड्यातील मोडकळीस आलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था व परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांची दखल घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्यामुळे शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
आदिवासीपाड्यातील सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यावर धोकादायक झाडांच्या फांद्या वाढल्या होत्या. तसेच परिसरात वीजेची सुविधा नसल्याने स्थानिक आदिवासी बांधवांना अंधारात जीवन जगावे लागत असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईचे महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, शौचालयाच्या दुरुस्तीसोबतच परिसरात वीजपुरवठा आणि इतर नागरी सुविधांची मागणी करत ७ जुलै २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि आदिवासीपाड्यातील कार्यकर्त्यांनी घणसोली वॉर्ड कार्यालयात निवेदन सादर केले. या मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून उर्वरित प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लागावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.




