मनमाड: सध्याची आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या धर्तीवर मनमाड नगरपरिषदेनेही घरपट्टी आणि व्यावसायिक (वाणिज्य) करात ५० टक्के सरसकट सूट द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी केली आहे. या संदर्भातील एक सविस्तर मागणीचे निवेदन त्यांनी मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांना सादर केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगरपरिषदेने आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय संमतीने घरपट्टी व व्यावसायिक कर आकारणीमध्ये ५० टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक आणि लोकहितैषी निर्णय मंजूर केला आहे, तसेच जिल्हाधिकारी समितीनेही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याच धर्तीवर मनमाड नगरपरिषदेनेही तात्काळ पावले उचलून तसा ठराव मंजूर करावा आणि शासनाची मंजुरी मिळवून मनमाडकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महागाई, मंदी आणि बेरोजगारीमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि छोटे व्यापारी कमालीच्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जर सटाणा नगरपरिषद त्यांच्या नागरिकांना ५०% सूट देऊन जिल्हाधिकारी समितीची मंजुरी मिळवू शकते, तर मनमाड नगरपरिषद देखील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा निर्णय घेऊ शकते.
शहरातील सर्वसामान्य जनतेच्या व व्यापाऱ्यांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रशासनाने त्वरित सवलत जाहीर करावी. जर या मागणीवर सकारात्मक विचार झाला तर एक इतिहास घडेल असेही विलास आहिरे यांनी म्हटले आहे आहे. “सटाणा नगरपरिषदेचा निर्णय राज्यातील इतर स्वराज्य संस्थांसाठी एक आदर्श वस्तूपाठ ठरला आहे. मनमाड नगरपरिषदेनेही लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने या सवलतीचा ठराव मंजूर करून मनमाडच्या जनतेला मोठा आर्थिक दिलासा द्यावा.
या मागणीमुळे आता मनमाड नगरपरिषद प्रशासन यावर काय निर्णय घेते आणि मनमाडकरांना करातून सवलत मिळते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. यावेळी जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा नेते दिपक बाबा साळवे, शहर सचिव अमोल केदारे, शहर उपाध्यक्ष निलेश निकम, सागर गाडे, संघटक अनिल कांबळे, सुनील बागुल, गौतम कर्डक, दिलीप चव्हाण, खुशाल थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.





