मुंबई : बस प्रवासातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रवासभाड्यातील सवलतीसाठी १ सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या गोंधळी कारभाराचा आणि प्रवाशांकडून होत असलेल्या अतिरिक्त वसुलीचा तीव्र निषेध करत NCMC कार्डची सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी वंचितने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) अकाउंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सवाल करत, बस प्रवास NCMC स्मार्ट कार्डचा गोंधळी कारभार, लुटीचा खेळ थांबवत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी बस प्रवासाच्या भाड्यात देण्यात येणारी सवलत आता NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातूनच देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधी NCMC कार्ड काढणे आणि त्यामध्ये रिचार्ज करणे आवश्यक ठरत असून, कार्ड नसल्यास किंवा तांत्रिक कारणामुळे कार्डचा वापर न झाल्यास प्रवाशांना पूर्ण प्रवासभाडे भरावे लागत असल्याचे वंचितने म्हटले आहे.
प्रवासादरम्यान NCMC कार्ड असूनही सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी मोजकेच पैसे घेऊन प्रवासाला निघाले असताना त्यांना बसमध्ये पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून मिळाल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले.
NCMC प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर करून व्यवस्था सक्षम करावी; मात्र त्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड देणे अन्यायकारक असल्याचे वंचितने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत मिळत असलेल्या प्रवासभाड्यातील सवलतींसाठी NCMC कार्डची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे सवलत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच बस स्थानकांवरील कर्मचारी, चालक आणि वाहक यांना NCMC कार्डची सक्ती करू नये, प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी शासनाने स्पष्ट सूचना द्याव्यात आणि प्रवासभाड्याच्या नावावर सुरू असलेला हा गोंधळ तात्काळ थांबवावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची गैरसोय अशीच सुरू राहिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.





