नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये (दि. १९) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवरायांच्या विचारांचा जागर करत त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दीपक पगारे (महानगर प्रमुख, वंचित बहुजन युवा आघाडी), उर्मिला गायकवाड (वंचित बहुजन महिला आघाडी), बाळासाहेब शेजवळ (दिंडोरी तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti)
उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी शिवरायांच्या पराक्रमाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘रयतेचे राज्य’ हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर जगासाठी आदर्श आहे. वंचितांना आणि शोषितांना न्याय देण्याचे कार्य महाराजांनी आपल्या स्वराज्यात केले. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti)
गंगुर्डे यांनी यावेळी संपूर्ण नाशिककरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत, शिवरायांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेली “जय भवानी, जय शिवाजी” ची घोषणाबाजी आणि शिवप्रेमींचा उत्साह यामुळे परिसर शिवमय झाला होता. विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत दिमाखात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.






