– संजीव चांदोरकर
“हॉर्मुझ” एकच नाही; भविष्यात जागतिक समुद्री मार्गांवर बरेच “चोक पॉईंट्स” तयार होऊ शकतात ! तसे झाले तर जागतिक व्यापाराचा सारा पट मुळापासून बदलू शकतो.
कारण जागतिक वास्तुमालाच्या ८५ टक्के वाहतूक समुद्रमार्गाने होते.
तत्वतः जहाजे चौक पॉइंटला वळसा घालून जाऊ शकतात, पण त्यासाठी अधिक दिवस, अधिक इंधन, अधिक विमा आणि अधिक खर्च येतो.
२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला करण्याच्या आधी हॉर्मुझ सामुद्रधुनी आज आहे तशीच होती. त्यातून दररोज अंदाजे १४० जहाजे जा ये करत होती.
मूळात हा लढाई टोकाची विषम लढाई होती. अजूनही आहे. हल्ला झाल्यानंतर, हॉर्मुझ बंद करून जागतिक इंधन व्यापार वेठीला धरून आपण अमेरिकेवर काउंटर प्दडपण आणू शकतो याचा साक्षात्कार इराणला झाला.
लक्षात घ्या ; इराणला साक्षात्कार कधी झाला ? तर इस्त्रायल -अमेरिकेने हल्ला केल्यानंतर ; त्यांनी इराणच्या राष्ट्र आणि धर्म प्रमुखांना बॉम्ब टाकून मारल्यानंतर.
होर्मूझ आपल्या हातातील एक असे अस्त्र आहे , त्याचा वापर करता येईल हे कळल्यानंतर इराणने ती सामुद्रधुनी बंद केली. उध्वस्त झालेल्या देशासाठी नवीन वित्तीय स्रोत लागणार त्यासाठी होर्मूझ मधून जा ये करणाऱ्या जहाजांवर टोल लावण्याची घोषणा केली.
लक्षात घ्या ; आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे हॉर्मुझ सामुद्रधुनी इराण आणि ओमान या दोन देशांच्या सार्वभौम नाविक हद्दीमध्ये आहे हे सर्व जण मान्य करतात.
आता इंडोनेशियाने जाहीररीत्या प्रस्ताव मांडला आहे की “मलाक्का” सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर तो देश, इतर संलग्न देशांशी विचार विनिमय करून टोल लावू शकतो.
“मलाक्का” सामुद्रधुनी हिंदी आणि पॅसिफिक महासागराला जोडणाऱ्या समुद्री मार्गामधील एक ९०० किमी लांबीचा चिंचोळा पट्टा आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांच्या हद्दीना स्पर्श करणारा.
मलेशिया आणि सिंगापूर यांनी इंडोनेशियाचा हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे आजतरी जाहीर केले आहे. पण हे भविष्यात जागतिक समुद्री व्यापारात हा एक नवीन चौक पॉईंट तयार होऊ शकतो.
मलाक्का मधून दररोज २०० जहाजे जा ये करतात, हार्मुझपेक्षा दीडपट. जागतिक समुद्री वाहतुकीच्या ३० टक्के वाहतूक त्यातून होते. जपान, दक्षिण कोरिया आणि चीनच्या बंदरात जाणारा वाहने यातून जा ये करतात. सर्वात जास्त इंधन, वास्तुमाल चीनला जाणारा असतो. हा मुद्दा लक्षात ठेवूया आणि पुढे जाऊया
इंडोनेशियला “मलाक्का” ची उचकी आत्ताच कशी लागली ? इराणने दाखवलेल्या धैर्यामागे चीन आहे हे आता सर्वांना आणि विशेषतः अमेरिकला उमजले आहे. आता उमजले ? आणि म्हणे ही महासत्ता !
इराणच्या मागे चीन उभा राहिला असेल तर चीनला भविष्यात असाच धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने इंडोनेशियाला उचकवले आहे.
अजून पुढे ; अगदी अलीकडे , इराण युद्ध सुरूच असताना मार्च २०२६ मध्ये अमेरिका आणि इंडोनेशिया मध्ये एक महत्वाकांक्षी व्यापार करार आणि संरक्षण करार झाला आहे…
एवढे सांगितले की सगळे अर्थ लागतील. याचे अधिक अर्थ अर्थातच भविष्यात उलगडतील.
आपापल्या हद्दीतील चिंचोळ्या समुद्री मार्गाचे अस्त्र म्हणून वापर करता येईल हे आता जगाच्या हार्डडिस्क वर कोरले गेले आहे. ते कधी वापरले जाईल हे काळच ठरवेल
उदा येमेन देशाच्या नाविक हद्दीतून जाणारा बाब एल मांडब हा असाच एक चोक पॉईंट आज देखील चर्चेत असतो. हुती संघटनेमुळे. सुवेझ आणि पनामा कालवा आहेत, तसेच अजून छोटे मोठे चिंचोळे समुद्री मार्ग आहेत. भविष्यात त्या त्या देशांकडून. किंवा खरेतर त्या देशांच्या मागे उभ्या राहणाऱ्या महासत्तांकड्न. त्या छोट्या देशांना उचकावुन त्यांचा अस्त्र म्हणून वापर झाला तर आश्चर्य वाटायला नको.
नवउदारमतवादाने देशांच्या सीमा रहित मुक्त व्यापाराचे तत्वज्ञान सर्व जगाच्या गळी उतरवले ते अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून.
त्याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मुक्त जागतिक व्यापाराला सुरुंग लावत सुटले आहेत हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल.
नवउदारमतवादी आर्थिक विचार समग्र / होलिस्टिक विचार करू शकत नाहीत. बुद्धी नाही म्हणून नाही. फक्त कॉर्पोरेट भांडवलावरील जास्तीत जास्त नफा , आणि कमीत कमी जोखीम असा झापडबंद / स्वार्थांधळा आर्थिक विचार आहे तो. त्यांची चिरफाड केल्याशिवाय जगाची जनकेंद्री, पर्यावरण केंद्री नवीन घडी बसू शकतं नाही.
चालताना पायाखाली बघावे लागते. मान्य. पण मधून मधून मान उचलून दूरवर हा रस्ता कोठे घेऊन जाणार आहे हे देखील बघावे लागते.






